Showing posts with label कोरोनावर आधारित भाषण korona. Show all posts
Showing posts with label कोरोनावर आधारित भाषण korona. Show all posts

Thursday, 5 August 2021

सोपे भाषण

गांधी जयंती सोपे भाषण
     आज 2 ऑक्टोंबर भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती, आपल्या भारत देशामध्ये राष्ट्रीय सण म्हणून साजरी केली जाते आणि या राष्ट्रीय सणाच्या निमित्ताने उपस्थित असणाऱ्या जनसमुदायाला माझे प्रणाम.

     विविध प्रांत, भाषा, वर्ण, वंश यांनी नटलेल्या भारत देशावर सुमारे साडेतीनशे वर्षे इंग्रजांनी जुलमी राज्य केले. आपल्या भारतभूमीला गुलाम बनवले. याच्या विरोधात मोठ्या हिमतीने आव्हान जर कोणी दिले असेल तर; ते होते भारताचे बापूजी म्हणजेच महात्मा गांधी.

   आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी गांधीजींनी इंग्रजांच्या विरोधात काठी आणि बंदुकीचा वापर नाही केला. त्यांनी सत्य अहिंसा आणि सत्याग्रह या तीन तत्वांचा अवलंब केला. यांच्या जोरावरच त्यांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. गांधीजींना माहित होते इंग्रजांच्या शस्त्रा पुढे निशस्त्र शेतकऱ्यांचा कधीच टिकाव लागणार नाही. यांच्याशी मुकाबला करायचा असेल तर त्यांना व त्यांच्या धोरणांना विरोधच केला पाहिजे, म्हणून त्यांनी सत्याग्रह आणि असहकाराची आंदोलने उभी केली.

      त्यांनी केलेला सगळ्यात पहिला सत्याग्रह म्हणजेच चंपारण व खेडा सत्याग्रह. त्याकाळी इंग्रज... शेतकऱ्यांवर जबरदस्तीने कर आकारणी करत असत. इंग्रज जे सांगतील तेच पीक शेतकऱ्यांनी पिकवायचे असा दंडक असायचा. या जाचाला शेतकरी कंटाळले होते. त्यातच दुष्काळ आणि अवर्षण याने शेतकऱ्यांचे पार कंबरडे मोडले होते. अशी केविलवाणी अवस्था शेतकऱ्यांची झाली होती. यातून या जाचातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी गांधीजींनी कंबर कसली. चंपारण व खेडा येथे निळ पिकवण्याच्या अन्यायकारी निर्णयाविरोधात पहिला सत्याग्रह घडवून आणला. सर्व शेतकऱ्यांनी गांधीजींच्या हाकेला ओ देऊन निळ पिकवण्यावर बहिष्कार घातला. शेतकऱ्यांची ही एकी पाहून इंग्रजांनी आपली सक्ती मागे घेतली. इथून पुढे गांधीजींनी हेच आपले समाजसेवेचे व लोक हिताचे कर्तव्य मानून, शास्त्र समजून देश सेवेसाठी सर्वस्व वेचले अशा या महात्म्यास माझा शतशः प्रणाम....


शिक्षक दिन भाषण🖋️🖋️✒️✒️✒️📚

      नमस्कार, आज 5 सप्टेंबर भारताचे पहिले उपराष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म. आपण भारतभर राष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म आजच्या तामिळनाडू राज्यातील तीरुत्थानी या गावी झाला. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे सात्विक, सज्जन व चारित्र्यसंपन्न पुरुष होते. सर्वांनी आदर्श घ्यावा असे त्यांचे शांत व समजूतदार वर्तन होते. लहानपणापासून शिक्षण व अभ्यासाची प्रचंड आवड त्यामुळे वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी डॉक्टरेट इन फिलोसोफी ही पदवी मिळवली.

     म्हैसूर, कलकत्ता बनारस इत्यादी शहरातील विद्यापीठात त्यांनी तत्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून उत्कृष्ट काम पाहिले. कोलकत्ता विद्यापीठाचे काम सांभाळत ते बनारस विद्यापीठात सुट्टीच्या वेळात सुद्धा प्रशासनाचे काम न थकता पाहायचे. मद्रासच्या ख्रिश्चन मिशनरी च्या शाळा आणि महाविद्यालयात शिकून सुद्धा त्यांनी हिंदू धर्मातील वैदिक तत्वज्ञानाचा सखोल अभ्यास केला.डॉ राधाकृष्णन स्वामी विवेकानंदांच्या आदर्शावर चालणारे एक तत्त्ववेत्ते होते. संस्कृत भाषेचा अभ्यास करत करत वेदांवर त्यांनी शोधनिबंध लिहिले. भारतीय संस्कृती आणि पाश्चिमात्यांची जीवनपद्धती यांचा मेळ घालणारा जाणकार तत्ववेत्ता असं म्हटलं तरी वावगे होणार नाही. त्यांच्या याच सर्वसमावेशक गुणांचा विचार करून ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी मार्फत त्यांना तत्त्वज्ञानावर भाष्य करण्यासाठी वर्षातून काही महिने बोलावले जात होते. आपल्या कार्यकाळात डॉक्टर राधाकृष्णन यांनी हिंदू धर्म तसेच वैदिक तत्वज्ञानावर जवळ जवळ 47 ग्रंथ लिहिले. आज देखील त्यांचे हे ग्रंथ जागतिक विविध विद्यापीठांमध्ये अभ्यासले जातात.

      ते स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते. त्यांच्या उत्कृष्ट राजकीय कार्याचा विचार करून भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न 1952 साली त्यांना देण्यात आला.

     कुलगुरू हा समस्त गुरुकुला चा आचार्य असावयास हवा तो ज्ञानाने, तपाने, चारित्र्याने परिपूर्ण असावा, सर्वांच्या अग्रस्थानी असावा, असा डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचा विश्वास होता. एक शिक्षक शिष्याला ज्ञान देताना परिपूर्ण असावा असे त्यांचे मत होते. डॉक्टर सर्वपल्ली हे गुरूंचे गुरू होते, म्हणूनच शिक्षकी पेशाबद्दल त्यांचे असणारे प्रेम व जिव्हाळा पाहून त्यांच्या चाळीस वर्षाच्या कार्याचे कौतुक व्हावे म्हणून भारतरत्न डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म भारतामध्ये शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो अशा या तत्ववेत्यास माझा मानाचा मुजरा🙏🙏🙏


भाषण क्रमांक 2

शिस्त असेल मनाला तर हरवू कोरोनाला

आज आपल्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जमलेल्या सर्व श्रोत्यांना, प्रिय अध्यापक व विद्यार्थी मित्रांनो माझ्याकडून सादर नमस्कार.

आपणा सर्वांना माहीतच आहे की, आजच्या दिवशी म्हणजेच 15 ऑगस्ट 1947 रोजी, इंग्रजी जुलमी राजवटी कडून आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. त्यावेळी लाल किल्ल्यावरून पंडित नेहरूंनी स्वातंत्र्याच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या होत्या. गेल्या 75 वर्षात आपण खूप प्रगती केली पण; समस्या देखील तेवढ्याच निर्माण केल्या. एकीकडे स्वातंत्र्याचा आनंद आहे पण; दारिद्र्य व बेकारी, लोकसंख्यावाढ यांचे दुःख देखील आहे आणि त्यात कमी काय म्हणून यावर्षी कोरोना ने देखील आपल्याला त्राहि त्राहि करून सोडलेला आहे. आपल्या देशाने शेती, विज्ञान - तंत्रज्ञानात खूप प्रगती केली पण; आरोग्य सेवेमध्ये मात्र भारत कमी पडत असताना दिसत आहे. 2019 पासून 2021 पर्यंत आपण कोरोनाच्या दाट छायेत वावरत आहोत. स्वातंत्र्य असून देखील घरात एकटे कोंडून पडलो आहोत.
त्या काळी इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरोधात आपल्या देशभक्तांनी क्रांतिकारकांनी आवाज उठवला, त्यांच्याशी दोन हात करून त्यांचं पारतंत्र्य आपण उलथवून टाकले पण; गेले दोन वर्ष काही आपण कोरोनाचे पारतंत्र्य उलथवून टाकू शकलो नाही. त्या काळात जसे आपण भाषा -प्रांत, धर्म- पंथ, जात -पात न पाहता एक दिलाने अन्यायी इंग्रजांना पळवून लावले अगदी तशीच एकी आज आपल्याला दाखवायला हवी. सर्व हेवेदावे बाजूला सारून एकत्र येऊन कोरोनाला हरवायला हवे. आता आपल्याला कुठल्या क्रांतीची, उठावाची गरज नाही, तर गरज आहे ती म्हणजे एकमेकाला आधार देण्याची, एकमेकाला मदत करण्याची. मग हरवायचे ना कोरोनाला, चला तर मग रोज साबणाने हात धुवुया, मास्कचा नियमित वापर करुया, सुरक्षित अंतर ठेवूया, डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी यांना धन्यवाद देऊया, त्यांना मदत करूया, इतरांची मोठ्यांची काळजी घेऊया. चला तर मग उठुया नियम पाळूया कोरोना ला पळवून लावूया.
जय हिंद! जय भारत!

भाषण क्रमांक 3

समाज माध्यमांच्या मायाजालात आजची तरुण पिढी

 आजच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त जमलेले या देशाचे नागरिक तसेच माझे आदरणीय गुरुजन व विद्यार्थी मित्रांनो.
      15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. इंग्रजांच्या दीडशे वर्षांच्या जुलमी राजवटीविरुद्ध क्रांतिकारकांनी आवाज उठवला, शिवरायांनी जसे सह्याद्रीला ढाल करून मोगली आक्रमणाला सळो की पळो करून सोडले तसेच थोर क्रांतिकारकांनी देशभक्तीची ढाल करून इंग्रजी राजवट उलथवून टाकली. आत्ता आपला भारत पूर्ण स्वतंत्र आहे. पूर्वीसारखी परिस्थिती आत्ता राहिलेली नाही. आपला देश कुणाच्यातरी राजकीय दबावाखाली मांडलिक नाही. पण माहिती तंत्रज्ञानाच्या महा स्फोटात जगातील प्रत्येक देश आपला दबाव तयार करत आहेत. आज देखील अमेरिका, चीन, इंग्लंड सारखे प्रगत देश आपल्या माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करून भारता सारख्या देशावर वर्चस्व प्रस्थापित करत आहेत. आधुनिक डाटा प्रणालीचा उपयोग करून जगाला आपल्या नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करू लागले आहेत. अशा या माहिती तंत्रज्ञान व इंटरनेटच्या मायाजालात आपण न कळत त्यांच्या हातातील बाहुले बनत आहोत याची जाणीव आजच्या तरुणांना नाही. आशा या माहिती डाटा युगात आपले वेगळे अस्तित्व टिकवण्यासाठी भारताने कंबर कसली पाहिजे.
    आजची तरुण पिढी वाढत्या इंटरनेट वापरामुळे फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सऍप सारख्या सोशल मीडियाच्या आहारी जाऊन आपले जीवन मातीमोल करत आहेत. आभाशी प्रलोभनांना बळी  पडत आहेत. कष्ट हा शब्दच विसरले आहेत. सोशल मीडियावर बेगडी मोठेपणा मिरवत आहेत. यातून सर्वांनी बाहेर पडायला हवे. प्रत्येकाने आता.... नको नको नेट प्रत्यक्ष भेट.... याचा विचार करायला हवा. 
     इंटरनेट चा मराठी अर्थच मुळी आंतरजाल असा आहे.. कोळी जसा शिकार मिळवण्यासाठी जाळं विणून शिकारी ची वाट पाहत बसतो आणि योग्य वेळी शिकार करतो अगदी तसेच आपण या अंतरजालात अडकून पडलो आहोत. चॅट च्या नादाने मॅट होऊन गेलो आहोत. म्हणून... टिक टॉक आणि नाऊ स्टॉप... म्हणण्याची वेळ आली आहे.
       व्हाट्सअप आणि आता गप्प.. असं म्हणूया, आपल्या जीवनाकडे लक्ष देऊया. जगात कष्टाशिवाय पर्याय नाही हे जाणून घेऊया. वेळीच सावध होऊया. आंतरजालाच्या मायाजालाचे धोके समजून घेऊया. पुन्हा एकदा या आभासी पारतंत्र्यातून मुक्त होऊया आणि खऱ्या स्वातंत्र्याचा अनुभव घेऊया. 
जय हिंद! जय भारत!