Showing posts with label डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम. Show all posts
Showing posts with label डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम. Show all posts

Thursday, 12 October 2023

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम

 


सर्वांना सादर नमस्कार

          आपल्या भारत देशाने जगाला खूप चांगली नर रत्ने दिली आहेत. त्यातील एक रत्न म्हणजे आपल्या भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम. कलाम यांचा जन्म तामिळनाडूमध्ये चेन्नईच्या जवळ रामेश्वरम या ठिकाणी 15 ऑक्टोबर 1931 रोजी झाला. त्यांचे पूर्ण नाव आऊल पाकिर जैनालुब्दीन अब्दुल कलाम असे होते. त्यांना वाचनाची व शिक्षणाची फार आवड होती तसेच पेपर विकणारा एक विद्यार्थी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर भारताचा राष्ट्रपती होऊ शकतो, याची आठवण म्हणून आपल्या देशामध्ये कलाम यांचा जन्मदिन जागतिक विद्यार्थी दिन व वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो.

        त्यांचे घर समुद्राच्या काठाला होते. त्यांचे वडील मासेमारी करणाऱ्या कोळी लोकांना आपली होडी भाड्याने देऊन आपला उदरनिर्वाह करायचे. त्यामुळे त्यांची परिस्थिती बेताची होती. अब्दुल कलाम आपल्या वडिलांना फारच आदर्श मानायचे. त्यांची कष्ट करण्याची जिद्द पाहूनच कलाम यांना तासन तास वाचन व अभ्यास करण्याची तसेच कष्ट करण्याची प्रेरणा मिळाली.लहानपणी वडिलांच्या बरोबर ते मासेमारी करण्या साठी तसेच होडी चालवण्यासाठी समुद्रकिनारी जायचे तिथे समुद्र-पक्षी उडताना पाहून विमान बनवण्याच्या क्षेत्रात काम करण्याचे, विमानाशी संबंधित शिक्षण पूर्ण करण्याचे त्यांच्या बालमनाने ठरवले.

        त्यांनी प्राथमिक शाळेतून शिक्षण पूर्ण करत मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून विमान व रॉकेट बनवणे यांचे तांत्रिक पदवी शिक्षण पूर्ण केले. नंतर भारतीय संरक्षण व अनुसंधान संस्थेमध्ये ते रुजू झाले. त्यांच्या कारकिर्दीत भारतात 1974 व 1998 मध्ये अतिशय गुप्त पद्धतीने पोखरण येथे अणुचाचणी झाली.भारताला जगातील एक शक्तीशाली राष्ट्र म्हणून मान्यता मिळाली. त्यांच्या मते 'शांती हवी असेल तर शक्ती पाहिजे, शक्ती शिवाय शांती नाही' म्हणून त्यांनी भारताची शक्ती म्हणजेच ताकद वाढविण्यासाठी भारतीय बनावटीची क्षेपणास्त्रे तयार केली. म्हणूनच त्यांना मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते.

    मुस्लिम धर्मा बरोबरच हिंदू धर्मातील आदर्श तत्वे आणि शिकवण यांचे त्यांनी आपल्या हयातीत सतत अनुकरण केले, त्यामुळेच त्यांचा स्वभाव मनमिळावू व विनम्र बनला होता. आपल्या भारत देशाचे भविष्य म्हणजे लहान मुले, मुलांना योग्य संस्कार आणि शिक्षण दिले तरच आपला भारत बलशाली होईल म्हणूनच राष्ट्रपती झाल्या नंतर ते मुलांच्यात रममाण व्हायचे. त्यांना आधुनिक विज्ञान विषयी गोष्टी सांगायचे.

           भारतीय लोकांचे राष्ट्रपती म्हणून नावाजलेले आदर्श व्यक्तिमत्व  कलाम साहेबांना माझा मानाचा मुजरा.