Showing posts with label लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल. Show all posts
Showing posts with label लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल. Show all posts

Friday, 27 October 2023

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल

 


भारतरत्न, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल   

      भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म 31 ऑक्टोबर 1875 मध्ये करमसद गुजरात येथे झाला. त्यांचे मूळ नाव वल्लभभाई झवेरभाई पटेल असे होते.त्यांचे तीन भाऊ आणि एक बहीण असा परिवार होता. त्यांचे वडील शेती करायचे त्यामुळे घरची परिस्थिती बेताची होती. घरच्या कामात हातभार लावावा लागत असल्यामुळे त्यांनी मॅट्रिकची परीक्षा उशिरा दिली. त्यांनी लहानपणी मनाशी ठरवले होते की आपण बॅरिस्टर व्हायचे त्यासाठी त्यांनी प्रयत्न देखील सुरू केले पण; बॅरिस्टर ची पुस्तक घेण्याची आर्थिक कुवत त्यांच्याकडे नव्हती. म्हणून त्यांनी तेथीलच एका बॅरिस्टर ची परीक्षा देणाऱ्या माणसाकडून पुस्तके उधार घेऊन अभ्यास करायला सुरुवात केली आणि ते बॅरिस्टर झाले.

       पुढे महात्मा गांधीजींच्या संपर्कात आल्यामुळे ते राजकीय आणि सामाजिक जीवनात उतरले. गुजरात मधील खेडा आणि बारडोली च्या सत्याग्रहामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. खेडा या गावांमध्ये त्या काळात दुष्काळ पडलेला होता. 1917 ची ही गोष्ट इंग्रजांनी दुष्काळात देखील शेतकऱ्यांच्या वर अन्यायकारक कर लादलेला होता. यांच्याविरुद्ध आंदोलन करण्यासाठी महात्मा गांधींनी खेडा येथील शेतकऱ्यांच्या सत्याग्रहाची योजना आखली. या सत्याग्रहाच्या आंदोलनामध्ये सरदार वल्लभाई पटेल यांनी प्रत्येक घरात फिरून लोकांचे प्रबोधन केले. इंग्रजी शासनाच्या जुल्माविरुद्ध आवाज उठवण्यास सुरुवात केली. हा सत्याग्रह यशस्वी करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला म्हणून तेथील स्त्रियांनी त्यांना सरदार ही उपाधी देऊन गौरव केला. तेंव्हापासून ते लोकांचे सरदार झाले. 

       पुढे आपल्या राजकीय जीवनात त्यांनी काँग्रेसचे अध्यक्षपदही भूषवले. प्रांतिक विधिमंडळात ते निवडून आल्यामुळे त्यांनी राष्ट्रीय राजकारणात सक्रिय सहभाग घेतला. स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री म्हणून यशस्वी आणि खंबीर कारकीर्द गाजवली. त्याच काळात पाकिस्तानची निर्मिती झाली आणि पाकिस्तानातील निर्वासित जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांचे पुनर्वसन करण्याचे महत्वपूर्ण कार्य केले. त्याच काळात देशांमध्ये जवळजवळ 565 संस्थाने होती या आपल्या संस्थानांना मुत्सद्यगिरीने देशात विलीन करण्याचे महत्त्वाचे काम केले. रक्ताचा थेंब न सांडता अखंड भारताला जोडण्याचं काम सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले, म्हणूनच त्यांना आधुनिक भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखले जाते.

       त्यांच्या या बहुमोल कार्याची दखल म्हणून 1991 मध्ये भारतरत्न पुरस्काराने त्यांना सन्मानित केले. सरदार पटेलांची जयंती आपल्या देशात राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी केली जाते. सरदार वल्लभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आपल्या देशामध्ये 2014 मध्ये मोदींच्या नेतृत्वाखालील शासनाने जगातील सर्वात उंच पुतळा नर्मदा नदीच्या काठी उभा करून राष्ट्रीय एकतेचे प्रतीक म्हणून 'स्टॅच्यु ऑफ युनिटी' नावाने देशाला अर्पण केला. सरदार वल्लभाई पटेल यांनी देशातील विविध संस्थानांचे एकीकरण करून एकसंघ भारत घडवला याच्या आठवणी साठी हा दिवस आपल्या देशामध्ये राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करतात.

    असे हे युगपुरुष देशाच्या नेहमी लक्षात राहतील. जय हिंद जय भारत.