Thursday, 12 September 2024

मायेची पाखर

 


मायेची पाखर

स्वाध्याय

प्रश्न १) एका वाक्यात उत्तरे लिहा

    अ) पाहुण्यानी अगोदर जेवायचे का नाकारले?

उत्तर – वसतिगृहातील मुलानी केलेला तो स्वयंपाक चांगला नसेल म्हणून पाहुण्यांनी अगोदर जेवायचे नाकारले.

    आ) वसतिगृहातील मुलांच्यावर अण्णांची माया कोणाप्रमाणे होती?

उत्तर – वसतिगृहातील मुलांवर अण्णांची माया ही मातेप्रमाणे होती.

    इ) अण्णा आयुष्यभर कोणाच्या शिक्षणासाठी झटत राहिले?

उत्तर – आण्णा आयुष्यभर गोरगरिबांच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी झटत राहिले.

    ई) कर्मवीर भाऊरावांनी कोणत्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शाळा सुरु केल्या?

उत्तर – कर्मवीर भाऊराव रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शाळा सुरु केल्या.

प्रश्न २) गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा.

     अ) संस्थेच्या आवारात एक मोठे वडाचे झाड होते.

     आ) स्वतःची मायेची शाल त्याच्या अंगावर घातली.

     इ) त्या मुलांपैकी कितीतरी जणांना आई नव्हती.

     ई) “अण्णा, आपण खरेखुरे या मुलांचे  आईबाप आहात.”

प्रश्न ३) कोण कोणाला म्हणाले ते लिहा.

     अ) “आता इथंच मुक्काम करा !”

- अण्णा पाहुण्यांना म्हणाले.

     आ) “जा रे, स्वयंपाक घरात काही शिल्लक असेल ते घेऊन ये बघू!”

- आण्णा एका मुलाला म्हणाले.

      इ) “आपणांस उदंड आयुष्य मिळो!”

- लेखक आण्णांना म्हणाले.

प्रश्न ४) थोडक्यात उत्तरे लिहा.

     (अ) लेखक उपाशी आहेत, हे समजल्यावर अण्णांनी काय केले?

उत्तर – लेखक उपाशी आहेत हे समजल्यावर अण्णांनी एका मुलाला स्वयंपाकघरात काही शिल्लक आहे का पाहण्याची आज्ञा केली. तेंव्हा मुलगा धावत जाऊन स्वयंपाकघरातून पिठले, भाकरी, कांदा, तेल घेऊन आला.

     (आ) मध्यरात्रीनंतर कोणता प्रसंग घडला?

उत्तर – मध्यरात्रीनंतर कशाची तरी चाहूल लागल्याचे निमित्त होऊन लेखकाला जाग आली. लेखकाला दिसले की आण्णा उठले आहेत. त्यांनी कंदील हातात घेतला. प्रत्येक मुलाला झोप लागली की नाही, त्यांच्या अंगावर पांघरून आहे की नाही हे पाहू लागले. एक मुलगा थंडीने कुड्कुडत होता. अण्णा त्याच्याजवळ गेले. त्यांनी त्याला आपल्या हातांनी उचलले. स्वतःच्या बिछ्यान्यावर आणून झोपवले. स्वतःची कांबळी त्याच्या अंगावर घातली. त्याला अगदी पोटाशी धरले. त्या उबेत मुलगा झोपी गेला. हा प्रसंग घडला.

   

     (इ) सकाळी उठल्यावर लेखकांच्या तोंडून कोणते उद्गार निघाले?

उत्तर – “अण्णा, आपण खरेखुरे या मुलांचे आईबाप आहात. या मुलांचेच नव्हे, तर या महाष्ट्रातील गोरगरीबांच्या मुलांचे आपण पालक आहात. आपणांस उदंड आयुष्य मिळो !” हे उद्गार लेखकांच्या तोंडून निघाले.

प्रश्न ५) वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या जुळवा.

                 ‘अ’ गट                           ‘ब’’ गट

     (१)  टाळाटाळ करणे                  (अ) झोप लागणे

     (२) पोटात कावळे ओरडणे             (आ) सतत प्रयत्न करणे

     (३) डोळा लागणे                     (इ) एखादी गोष्ट करायचे टाळणे

     (४) झटत राहणे                     (ई) खूप भूक लागणे

प्रश्न ६) लेखकाच्या पोटात कावळे ओरडत होते, म्हणजे लेखकाला खूप भूक लागली होती. आता खालील वाक्यांतील रंगीत शब्दांचा अर्थ शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या.

     (अ) भरपूर जेवण झाल्यावर नाना अजगरासारखे पडून होते.

- भरपूर जेवण केल्यामुळे नानांना झोप आली त्यामुळे ते झोपले. जेंव्हा खूप झोप येते तेंव्हा हा वाक्प्रचार वापरतात. याठिकाणी नानांची झोपण्याची कृती दाखवण्या साठी अजगरा सारखे पडून होते हा वाक्प्रचार वापरला आहे.

     (आ) दुपारच्या वेळी हळूच खाऊ घेताना बंड्या अजिबात आवाज होऊ देत नाही; म्हणून त्याला सगळे मांजरीच्या पायाचा म्हणतात.

- मांजराचे पाय मऊ असतात उंचावरून उडी मारली तरी त्याच्या पायाचा आवाज होत नाही. मांजर जेंव्हा चोरुन दूध पिते तेंव्हा त्याचा आवाज होत नाही. त्यामुळे एखादी गोष्ट. चोरुन करताना कोणताही आवाज न करता केली तर मांजरीच्या पायाचा हा वाक्प्रचार वापरतात.

प्रश्न ७) लिहा.

      लेखकाला कर्मवीर भाऊराव पाटलांबद्दल अत्यंत आदर आहे. तसा तुम्हांला आदर वाटणाऱ्या व्यक्तीबद्दल पाच ते सात ओळींत लिहा.

     - मला आदर वाटणारी व्यक्ती म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. सावरकरांना आपला देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त व्हावा असे लहानपणापासून वाटायचे. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने देश स्वतंत्र करण्यासाठी क्रांतिकार्याला वाहून घेतले होते. त्यांचे बंधू बाबाराव सावरकर आणि ते लहान असतानाच मित्रमेळा संघटना काढून आपल्या लहान मित्रांना क्रांतिकार्याची शिकवण दिली. देशप्रेमाचे धडे दिले. त्यामुळे स्वातंत्र्य मिळण्यास मदत झाली. त्यांनी देशाला स्वतंत्र करण्यासाठी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली. असे हे थोर क्रांतिकारक देशकार्याला वाहून घेण्यास आपणांस सदैव प्रेरणा देतात.

प्रश्न ८) सुरुवातीला एक वाक्य दिले आहे. तुमच्या मनाने पुढील वाक्ये लिहा.

    अ) सकाळची वेळ होती. कोवळे ऊन सगळीकडे पसरले होते. जणू निसर्गाने पिवळा सोनेरी गालिच्या पांघरला आहे असेच दिसत होते. कळ्यांची फुले उमलली होती. फुलांवर रंगीबेरंगी फुलपाखरे इकडून तिकडे उडत होती. वातावरण खूप आनंदी होते. मी सुद्धा त्या अनादादाई वातवरणात बागेमध्ये मस्त भटकत होतो.

    आ) बागेत गेल्यावर मला एक अळी दिसली......अळी पानावर होती. तिने अर्धे पान कुरतडून टाकले होते. कदाचित ती फुलापाखराची अळी असणार म्हणून मी तिला पानावरून कडून टाकले नाही. थोड्या दिवसाने तिचे फुलपाखरात रुपांतर होईल. अळीचे फुलपाखरू झालेले मला पहायला खूप आवडेल.

Friday, 26 July 2024

आदर्श शिक्षक पुरस्कार प्रपत्र कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार शिक्षक प्रपत्र PDF....स्वयं मूल्यमापन करण्या साठी फारच उपयुक्त.....


PDF डाऊनलोड करण्यासाठी येथे 👉    click     करा 

Tuesday, 16 January 2024

युग स्त्री सावित्रीबाई फुले

         


     वेळ होती सकाळी दहाची. भिडे वाड्यात मुली डोळ्याचा चातक करून सावित्रीबाईंची वाट पाहत होत्या. कधी एकदा आमची माऊली येते आणि आम्हाला पदराखाली घेते, याचा विचार करत बसल्या होत्या. तेवढ्यात दारात सावित्रीबाई आपले कपाळ रक्ताने माखलेल्या पदराने दाबून धरत आत येताना दिसल्या. ज्या पदरा खाली बसायचं होतं तोच पदर रक्ताने माखलेला होता. सगळ्या मुली रक्त पाहून हंबरडा फोडून सावित्रीबाईंच्या भोवती गोळा झाल्या. कशाबशा त्यांना बाजूला बसवून शांत करून सावित्रीबाईंनी स्वतःच डोक्याला पट्टी बांधली शेणामातीने माखलेली साडी बदलली. मुलींना कोळशाच्या पेन्सिलीने आणि जमिनीच्या पाठीवर अक्षर गिरवण्याचा सराव देऊ लागल्या. या छोट्याशा गोष्टीतून मित्रांनो माझ्या मनोगताचा विषय तुमच्या लक्षात आला असेल.

      व्यासपीठावरील मान्यवर आणि येथे जमलेल्या माझ्या बाल मित्रांनो.... अज्ञानरूपी अंधकाराने व्यापलेल्या, कळकट समाजातील स्त्रियांच्या, हृदयात.... शिक्षणाची ज्ञानज्योत... प्रज्वलित करून, स्वतः ज्ञानसागराच्या निरांजनातील वात होऊन, रक्ताचा एक एक थेंब आटवून, अखंड तेवत ठेवणारी युग स्त्री म्हणजेच सावित्रीबाई फुले.

        नायगाव येथील नेवासे पाटलांच्या घरात जन्मलेली ही ज्योत, अवघ्या नऊ वर्षांची असताना फुलांच्या घरची माळीन झाली.

     जगाच्या बाजारात गुलामगिरी, जातीयता, बेगडा धर्मवाद आणि वर्चस्ववाद बोकाळला असताना ज्योतिरावांच्या रूपाने एक सूर्य उदयास आला होता. त्या ज्ञानसूर्याने आपल्या प्रभावी विचारांच्या तेजाने सारा समाज भारून टाकला होता. आपल्या आजूबाजूची जनता शिकली तरच ती सुधारेल, अन्याय अत्याचाराविरुद्ध उभा राहील, हे त्यांनी ओळखले.  लोकांना विद्येचे महत्व पटवून देताना ते म्हणतात..


विद्येविना मती गेली. 

मतीविना नीती गेली, 

नीतीविना गती गेले, 

गतीविना वित्त गेले,

वित्ताविना शूद्र खचले.....

इतके अनर्थ एका अविद्येने केले.... 

      हेच विचार घेऊन सावित्रीबाई ज्योतिरावांच्या छत्रछायेखाली शिकल्या. शाळा सांभाळता सांभाळता त्या मुख्याध्यापिका झाल्या. 1848 ला शाळेत फक्त सहा मुली होत्या. पुढे हा ज्ञानयज्ञ इतका मोठा झाला की, सावित्रीबाईंनी आपल्या हयातीत 40 शाळांचे जणू ज्ञान विद्यापीठ तयार केले. 

    सावित्रीबाईंनी आपल्या साडीवर शेणाचे गोळे झेलले म्हणून आजच्या स्त्रीची साडी चकचकीत झाली. सावित्रीबाईंनी कर्मठ लोकांचे दगड डोक्यावर झेलून त्या रक्तबंबाळ झाल्या म्हणून आजची स्त्री कुंकवाचा लाल रंग तोऱ्याने मिरवत आहे.... अशा कितीतरी यातना सावित्रीबाईंनी झालेल्या म्हणून आजची स्त्री सुखाचा व स्वातंत्र्याचा मनमोकळा श्वास घेत आहे. अशा या महान समाज शिक्षिकेस युग स्त्रीस माझा मानाचा मुजरा🙏🏻🙏🏻🙏🏻

Friday, 27 October 2023

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल

 


भारतरत्न, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल   

      भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म 31 ऑक्टोबर 1875 मध्ये करमसद गुजरात येथे झाला. त्यांचे मूळ नाव वल्लभभाई झवेरभाई पटेल असे होते.त्यांचे तीन भाऊ आणि एक बहीण असा परिवार होता. त्यांचे वडील शेती करायचे त्यामुळे घरची परिस्थिती बेताची होती. घरच्या कामात हातभार लावावा लागत असल्यामुळे त्यांनी मॅट्रिकची परीक्षा उशिरा दिली. त्यांनी लहानपणी मनाशी ठरवले होते की आपण बॅरिस्टर व्हायचे त्यासाठी त्यांनी प्रयत्न देखील सुरू केले पण; बॅरिस्टर ची पुस्तक घेण्याची आर्थिक कुवत त्यांच्याकडे नव्हती. म्हणून त्यांनी तेथीलच एका बॅरिस्टर ची परीक्षा देणाऱ्या माणसाकडून पुस्तके उधार घेऊन अभ्यास करायला सुरुवात केली आणि ते बॅरिस्टर झाले.

       पुढे महात्मा गांधीजींच्या संपर्कात आल्यामुळे ते राजकीय आणि सामाजिक जीवनात उतरले. गुजरात मधील खेडा आणि बारडोली च्या सत्याग्रहामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. खेडा या गावांमध्ये त्या काळात दुष्काळ पडलेला होता. 1917 ची ही गोष्ट इंग्रजांनी दुष्काळात देखील शेतकऱ्यांच्या वर अन्यायकारक कर लादलेला होता. यांच्याविरुद्ध आंदोलन करण्यासाठी महात्मा गांधींनी खेडा येथील शेतकऱ्यांच्या सत्याग्रहाची योजना आखली. या सत्याग्रहाच्या आंदोलनामध्ये सरदार वल्लभाई पटेल यांनी प्रत्येक घरात फिरून लोकांचे प्रबोधन केले. इंग्रजी शासनाच्या जुल्माविरुद्ध आवाज उठवण्यास सुरुवात केली. हा सत्याग्रह यशस्वी करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला म्हणून तेथील स्त्रियांनी त्यांना सरदार ही उपाधी देऊन गौरव केला. तेंव्हापासून ते लोकांचे सरदार झाले. 

       पुढे आपल्या राजकीय जीवनात त्यांनी काँग्रेसचे अध्यक्षपदही भूषवले. प्रांतिक विधिमंडळात ते निवडून आल्यामुळे त्यांनी राष्ट्रीय राजकारणात सक्रिय सहभाग घेतला. स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री म्हणून यशस्वी आणि खंबीर कारकीर्द गाजवली. त्याच काळात पाकिस्तानची निर्मिती झाली आणि पाकिस्तानातील निर्वासित जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांचे पुनर्वसन करण्याचे महत्वपूर्ण कार्य केले. त्याच काळात देशांमध्ये जवळजवळ 565 संस्थाने होती या आपल्या संस्थानांना मुत्सद्यगिरीने देशात विलीन करण्याचे महत्त्वाचे काम केले. रक्ताचा थेंब न सांडता अखंड भारताला जोडण्याचं काम सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले, म्हणूनच त्यांना आधुनिक भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखले जाते.

       त्यांच्या या बहुमोल कार्याची दखल म्हणून 1991 मध्ये भारतरत्न पुरस्काराने त्यांना सन्मानित केले. सरदार पटेलांची जयंती आपल्या देशात राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी केली जाते. सरदार वल्लभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आपल्या देशामध्ये 2014 मध्ये मोदींच्या नेतृत्वाखालील शासनाने जगातील सर्वात उंच पुतळा नर्मदा नदीच्या काठी उभा करून राष्ट्रीय एकतेचे प्रतीक म्हणून 'स्टॅच्यु ऑफ युनिटी' नावाने देशाला अर्पण केला. सरदार वल्लभाई पटेल यांनी देशातील विविध संस्थानांचे एकीकरण करून एकसंघ भारत घडवला याच्या आठवणी साठी हा दिवस आपल्या देशामध्ये राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करतात.

    असे हे युगपुरुष देशाच्या नेहमी लक्षात राहतील. जय हिंद जय भारत.

Thursday, 12 October 2023

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम

 


सर्वांना सादर नमस्कार

          आपल्या भारत देशाने जगाला खूप चांगली नर रत्ने दिली आहेत. त्यातील एक रत्न म्हणजे आपल्या भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम. कलाम यांचा जन्म तामिळनाडूमध्ये चेन्नईच्या जवळ रामेश्वरम या ठिकाणी 15 ऑक्टोबर 1931 रोजी झाला. त्यांचे पूर्ण नाव आऊल पाकिर जैनालुब्दीन अब्दुल कलाम असे होते. त्यांना वाचनाची व शिक्षणाची फार आवड होती तसेच पेपर विकणारा एक विद्यार्थी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर भारताचा राष्ट्रपती होऊ शकतो, याची आठवण म्हणून आपल्या देशामध्ये कलाम यांचा जन्मदिन जागतिक विद्यार्थी दिन व वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो.

        त्यांचे घर समुद्राच्या काठाला होते. त्यांचे वडील मासेमारी करणाऱ्या कोळी लोकांना आपली होडी भाड्याने देऊन आपला उदरनिर्वाह करायचे. त्यामुळे त्यांची परिस्थिती बेताची होती. अब्दुल कलाम आपल्या वडिलांना फारच आदर्श मानायचे. त्यांची कष्ट करण्याची जिद्द पाहूनच कलाम यांना तासन तास वाचन व अभ्यास करण्याची तसेच कष्ट करण्याची प्रेरणा मिळाली.लहानपणी वडिलांच्या बरोबर ते मासेमारी करण्या साठी तसेच होडी चालवण्यासाठी समुद्रकिनारी जायचे तिथे समुद्र-पक्षी उडताना पाहून विमान बनवण्याच्या क्षेत्रात काम करण्याचे, विमानाशी संबंधित शिक्षण पूर्ण करण्याचे त्यांच्या बालमनाने ठरवले.

        त्यांनी प्राथमिक शाळेतून शिक्षण पूर्ण करत मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून विमान व रॉकेट बनवणे यांचे तांत्रिक पदवी शिक्षण पूर्ण केले. नंतर भारतीय संरक्षण व अनुसंधान संस्थेमध्ये ते रुजू झाले. त्यांच्या कारकिर्दीत भारतात 1974 व 1998 मध्ये अतिशय गुप्त पद्धतीने पोखरण येथे अणुचाचणी झाली.भारताला जगातील एक शक्तीशाली राष्ट्र म्हणून मान्यता मिळाली. त्यांच्या मते 'शांती हवी असेल तर शक्ती पाहिजे, शक्ती शिवाय शांती नाही' म्हणून त्यांनी भारताची शक्ती म्हणजेच ताकद वाढविण्यासाठी भारतीय बनावटीची क्षेपणास्त्रे तयार केली. म्हणूनच त्यांना मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते.

    मुस्लिम धर्मा बरोबरच हिंदू धर्मातील आदर्श तत्वे आणि शिकवण यांचे त्यांनी आपल्या हयातीत सतत अनुकरण केले, त्यामुळेच त्यांचा स्वभाव मनमिळावू व विनम्र बनला होता. आपल्या भारत देशाचे भविष्य म्हणजे लहान मुले, मुलांना योग्य संस्कार आणि शिक्षण दिले तरच आपला भारत बलशाली होईल म्हणूनच राष्ट्रपती झाल्या नंतर ते मुलांच्यात रममाण व्हायचे. त्यांना आधुनिक विज्ञान विषयी गोष्टी सांगायचे.

           भारतीय लोकांचे राष्ट्रपती म्हणून नावाजलेले आदर्श व्यक्तिमत्व  कलाम साहेबांना माझा मानाचा मुजरा.

Sunday, 1 October 2023

लालबहाद्दूर शास्त्री

        


भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री

      माझ्या सर्व बालमित्रांना माझा नमस्कार आज दोन ऑक्टोबर महात्मा गांधी यांच्या जयंती बरोबरच भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची देखील जयंती आपण भारतभर मोठ्या उत्साहात साजरी करतो. 

        लालबहादूर शास्त्री यांचा जन्म सध्याच्या अलाहाबाद या शहरांमध्ये झाला लहानपणापासून लालबहादूर शास्त्री यांना शिक्षण व देशसेवेची आवड होती. त्यांचे वडील शिक्षक असल्या मुळे त्यांना शिकण्याची देखील खूप आवड होती. परंतु लहान वयात वडिलांचे छत्र हरवल्या मुळे त्यांचे पालनपोषण त्यांच्या आजोळी झाले. त्यांनी काशी विश्वविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. तेथेच त्यांना शास्त्री ही पदवी मिळाली. 

          त्यांचे मूळ नाव लाल बहादूर श्रीवास्तव असे होते परंतु; त्यांनी आपले आडनाव शास्त्री असे ठेवले. तेंव्हा पासून ते लोकांचे लालबहाद्दूर शास्त्री झाले.समाजसेवेची आवड असल्याने भारतीय स्वातंत्र्य लढ्यात गांधीजींच्या विचाराने ते मार्गक्रमणा करू लागले. सत्य, प्रेम आणि अहिंसा यांचे ते पाईक झाले. काँग्रेस चे काही काळ राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून देखील काम पाहिले. भारत छोडो या आंदोलनामध्ये लालबहादूर शास्त्री यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. त्यांनी 'करो या मरो' या  गांधीजींच्या घोषणेला 'करो या मारो' असे क्रांतिकारी रूप दिले. त्यामुळे त्यांना भूमिगत राहावे लागले. इंग्रजांनी त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला देखील चालवला. त्यांना तुरुंगवास ही भोगाव लागला. नंतर पंडित नेहरू आणि महात्मा गांधी यांच्याबरोबर त्यांचे विचार जुळले आणि नेहरूंच्या पहिल्या मंत्रिमंडळात त्यांना गृहमंत्री म्हणून नेमले.

       पंडित नेहरूंच्या मृत्यूनंतर 1964 मध्ये ते भारताचे दुसरे पंतप्रधान म्हणून नियुक्त झाले. त्यांच्याच कार्यकाळात 1966 च्या पाकिस्तान युद्धामध्ये त्यांनी आपल्या चांगल्या नेतृत्व गुणांची देशवासीयांना प्रचिती आणून दिली. 'जय जवान जय किसान' अशी घोषणा देऊन देशप्रेमाची जागृती निर्माण केली आणि त्यामुळेच देशातील लोक संघटित झाले सैनिकांच्या मध्ये धाडस निर्माण होऊन, भारताने पाकिस्तान बरोबरचे युद्ध जिंकले. नुसते युद्ध जिंकले नाही तर; पाकिस्तान ची राजधानी लाहोर पर्यंतचा भूभाग जिंकून आपल्या ताब्यात घेतला होता. पाकिस्तान बरोबरच्या युद्धात त्यांनी दाखवलेले धाडस व नेतृत्व मान्य करून भारतीय शासनाने त्यांना भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित केले. अशा या थोर नेत्यास माझे कोटी कोटी नमन

Sunday, 24 September 2023

प्रथम सत्र व द्वितीय सत्र मूल्यमापन तक्ते

 यामध्ये माझ्या सर्व शिक्षक मित्रांना, प्रथम व द्वितीय सत्राचे मूल्यमापन तक्ते pdf स्वरुपात मिळतील प्रिंट काढण्यास सोपे आणि A 4 साईज मध्ये असल्यामुळे हाताळण्यास सोपे असे मूल्यमापन तक्ते नाक्कीच आवडतील. download करून घ्या आणि ब्लॉग वर कॉमेंट द्यायला विसरू नका. आपलाच शब्दयुवा 


इयत्ता १ ली मूल्यमापन तक्ता - DOWNLOAD

इयत्ता २ री  मूल्यमापन तक्ता - DOWNLOAD

इयत्ता ३ री मूल्यमापन तक्ता - DOWNLOAD

इयत्ता ४ थी मूल्यमापन तक्ता - DOWNLOAD

इयत्ता ५ वी मूल्यमापन तक्ता - DOWNLOAD

इयत्ता ६ वी मूल्यमापन तक्ता - DOWNLOAD

इयत्ता ७ वी मूल्यमापन तक्ता - DOWNLOAD

इयत्ता ८  वी मूल्यमापन तक्ता - DOWNLOAD

इयत्ता व विषय श्रेणी गोषवारा - DOWNLOAD

शाळा श्रेणी गोषवारा - DOWNLOAD